गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना; अपघातात अपंगत्व आल्यास अर्थसाह्य
*बुलढाणा दि. 3 (जिमाका):* गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सुधारणा करून दि. 19 एप्रिल 2023 नुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येते. त्यानुसार अपघातात शेतकऱ्याला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास शेतकरी किंवा वारसदारांना आर्थिक मदत दिल्या जाते. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
योजनेत 10 ते 75 वयोगटातील अपघातग्रस्त शेतकर्यांेच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता वहितीधारक शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकर्यातच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतक-याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणीही एक व्यक्ति) अशा एकूण दोघांसाठी योजना राबविण्यात येत आहे.
*अपघातग्रस्ताना 2 लाखाची मदत*
योजनेत अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख, अपघातामुळे दोन डोळे, दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास 2 लाख, अपघातामुळे एक डोळा आणि एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 2 लाख, तसेच अपघाताने एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख आर्थिक सहाय्य देण्यात येते.
योजनेत रस्ता अपघात,रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलाईटकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या हल्ल्यात/चावण्यामुळे जखमी,मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू , दंगल, अन्य कोणताही अपघात या अपघातांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे, योजनेत नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध,.सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून याबाबींचा समावेश असणार नाही.
जिल्ह्यातील अपघातग्रस्त शेतकरी, शेतक-यांचे वारसदार यांनी दि. 19 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात घटना घडलेली असेल तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याकडे 30 दिवसाच्या आत परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. अधिक माहितीसाठी कृषि विभागाच्या सर्व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोज ढगे यांनी केले आहे.
إرسال تعليق