खामगांव येथे १२ गाड्या ओढण्याची परंपरा कायम: दर्शनासाठी मंगळवारी २४ तास मंदिर खुले राहणार
खामगांव : येथील जगदंबा रोडवरील खंडोबा मंदिरात चैत्र पौर्णिमा अर्थातच हनुमान जयंतीला १२बैलगाड्या ओढण्याची दिडशे वर्ष जुनी परंपरा आहे. हि परंपरा अबाधीत ठेवण्यासाठी गडकरी (१२ बैलगाडे ओढणारे) यांना विशेष मान आहे. या गडकऱ्यांचे विधीवत पुजन करून खामगावातून मिरवणूक काढण्यात आली. तत्पुर्वी गडकऱ्यांची हळद लावणी सोहळा मंदिरात पार पडला. श्रध्दा आणि भक्तीचा सोहळा असलेल्या या पुरातन पर्वाची अनेकांना ओढ लागुन असते. मंगळवार दि. २३-०४-२०२४ चैत्र पौर्णिमेच्या ९ दिवस अगोदरच घटस्थापनेने १२ गाड्या ओढण्याच्या अनोख्या परंपरेची सुरूवात केली जाते. त्यानंतर चैत्र पौर्णिमेच्या अडीच दिवस अगोदर बैलगाड्या ओढणाऱ्या गडकऱ्यांना हळद लावून मिरवणूक काढली जाते. अतिशय भक्ती भावाने साजरा केल्या जाणाऱ्या या सोहळ्याचे खामगावातील अनेकांना आकर्षण असते. १२ बैलगाडी ओढणारे सात, नऊ, अकरा गडकरी अथवा त्यापेक्षाही अधिक संख्येने संपुर्ण श्रध्देने या सोहळ्यात हजेरी लावतात. रविवारी हळद लावलेल्या गडकऱ्यांची शहरातुन वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली. यावेळी खंडोबाचा भंडारा म्हणुन गडकऱ्यांनी सामान्यांना तसेच मान्यवरांना हळदिचा टिका लावून उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले.
सर्व धर्मीयांचा सहभाग विशेष म्हणजे ऐतिहासिक आणि महाराष्ट्रातील एकमेव बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव शहरात साजरा होणारा शांती महोत्सवाच्या (मोठी देवी) ठिकाणी म्हणजेच जगदंबा रोड, महात्मा बसवेश्वर चौक येथे खंडोबाचा उत्सव पार पडतो. मोठी देवी परिसरातच हा महोत्सव साजरा होतो. त्यामुळे या उत्सवाचे अनन्य साधारण महत्व असुन कमलसिंह गौतम चौकातुन १२ बैलगाडे ओढण्यात येतात. या उत्सवात सर्व धर्मीयांचा सहभाग असतो. १२ बैलगाडे ओढण्याची दिडशे वर्ष पुरातन परंपरा जोपासण्यासाठी खंडोबा मंडळाचे प्रयत्न आहेत. यंदा मंगळवारी सायंकाळी हा सोहळा पार पडणार आहे. तत्पुर्वी खंडोबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत.
Post a Comment