जमिनीच्या बक्षीस पत्राच्या नोंदीसाठी तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकले .त्यांनी चक्क 2 लाखाची घेतली लाच
काय आहे प्रकार :वाचा संपूर्ण वृत्त
गडब / अवंतिका म्हात्रे :- कोळगाव, ता. अलिबाग येथील जमिनीच्या बक्षीस पत्राच्या नोंदीसाठी २ लाखांची लाच घेणाऱ्या अलिबागच्या तहसिलदार मीनल दळवी यांना शुक्रवारी रंगेहाथ पकडण्यात आले. यामुळे महसूल यंत्रणेतील भ्रष्टाचार उघड झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई विभागाने ही कारवाई केली आहे.याबाबतचे वृत्त असे की, अलिबागमधील रोहन खोत यांच्या नातेवाईकांच्या कोळगाव येथील जमिनीच्या बक्षिस पत्राचे नोंदणी करण्याचे प्रकरण तहसिलदार कार्यालयाकडे दाखल झाले होते. हे प्रकरण तहसीलदार मीनल दळवी यांनी बरेच दिवस हेतुतः रेंगाळत ठेवले. या नोंदीसाठी रोहन खोत यांच्याकडे तहसिलदार मीनल दळवी यांनी तीन लाखांच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती दोन लाख देण्याचे ठरविण्यात आले. सदर रक्कम आपला एजंट राकेश चव्हाण याच्याकडे पैसे देण्यास दळवी यांनी सांगितले.
याबाबत खोत यांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर लेखी तक्रारही केली. या तक्रारीची दखल गांभीर्याने घेत एसीबी पथकाने गेले महिनाभर दळवी यांच्यावर पाळतही ठेवली. शुक्रवारी खोत यांना एजंट राकेश चव्हाण यांच्याकडे २ लाख रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. ते पैसे आणण्यासाठी राकेश हा खोत यांच्या रायगड बाजारसमोरील आर. के. मोबाईल या दुकानात गेला. खोत यांच्या कडून दोन लाख रुपये स्वीकारताना पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने तहसिलदारांचे नाव सांगितले. त्यानुसार पथकाने तहसिलदारांना गोंधळपाड्यातील बेवूड सोसायटीमधील निवासस्थानातून ताब्यात घेतले. या अचानकपणे घडलेल्या कारवाईने मीनल दळवी यांना धक्काच बसला त्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, एसीबी पथकाने दळवी यांच्या मालमत्तेची चौकशी सुरु केल्याचे सुत्रांनी सांगितले. अवैध मार्गाने त्यांनी किती संपत्ती जमा केली याची पडताळणी केली जाणार आहे. लाच लुचपत विभागाने तहसीलदार मिनल दळवी याना अटक करताच त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना ताबडतोब जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक ज्योती देशमुख, पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे आणि पथकाने ही कारवाई केली आहे.
पालकमंत्र्यांकडेही
तक्रार दाखल
*या प्रकाराने महसूल यंत्रणेत एकच खळबळ माजली आहे. सर्वसामान्यांतून मात्र समाधान व्यक्त केले जात आहे. दळवी यांच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या.*
रायगड एसीबीबाबत नाराजी
*गेल्या वर्षी ऑगस्ट २०२१ नवी मुंबई एसीबी पथकाने मुरुडचे तहसिलदार गमन गावित* *यांनाही अशाच प्रकारे लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. वास्तविक तक्रारदार हे रायगडचेच असताना कारवाई मात्र नवी मुंबई एसीबी करीत असल्याबद्दल जिल्हा एसीबी पथकाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ स्तरावरील* *अधिकारीच लाच घेताना पकडण्यात आल्याने रायगडच्या प्रशासनाबाबत सर्वसामान्यांमध्ये कमालीचे नाराजी पसरली आहे.*
Post a Comment